बौध्द धम्माचा स्वीकार करणारे अनुसूचीत जातींमधील लाखो बांधव आरक्षणाचे लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. या बौध्द नागरिकांचा समावेश आरक्षित वर्गाच्या सूचीमध्ये करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
आठवले यांनी देशविदेशातील बौध्द संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. भिख्खु संघटनेचे डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत प्रज्ञानंद, विजयराजे धमाल आदी उपस्थित होते. येत्या ऑक्टोबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या जागतिक बौध्द संमेलनाचे आमंत्रणही राष्ट्रपती कोविंद याना देण्यात आले. ते त्यांनी स्वीकारल्याचे आठवले यांनी सांगितले. अखिल भारतीय भिख्खु संघटनेतर्फे देशातील भिख्खुंसाठी सुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या भेटीवेळी आठवले यांनी देशाच्या सर्वोच्च स्थानी दलित समाजाचे प्रतीनिधीत्व करणारे कोविंद यांच्या कार्याबद्दल विशेष आभार मानले.
अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्मात सामील होणाऱ्या बांधवांना आरक्षणाच्या लाभांपासून वंचित ठेवले जाते. ते अधिकार त्यांना मिळायला हवेत असे ते म्हणाले. महाराष्ट्रात असे सुमारे २ कोटी बौध्द बांधव आहेत. याशिवाय देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १६ टक्के असलेल्या दलित वर्गातील इतर राज्यांतील नागरिकांनीही बैध्द धम्माचा स्वीकार केला आहे त्यांनाही अद्याप आरक्षणाचे लाभ मिळत नसल्याचे आठवले यांनी राष्ट्रपतीना सांगितले.