। अलिबाग । प्रतिनिधी राजेश बाष्टे ।
आदिवासी समाजावर माझे प्रेम आहे, आदिवासी समाजाच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार, त्यांना आधुनिक पद्धतीने जीवन जगता यावे, आधुनिक पद्धतीचा वापर करून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा मानस यावेळी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील बारशेत ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आ जयंत पाटील यांनी तातडीने सोडवल्याने त्यांना धन्यवाद देण्यासाठी ग्रामस्थांनी शेतकरी भवन येथे आ जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी बोरघर ग्रा.प.माजी सरपंच मधुकर ढेबे, पेझारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच ॲड मनोज धुमाळ, शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वॉर्ड, मोहन धुमाळ, धर्मा लोभी बारशेत येथील शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारशेत गावात काही दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आ जयंत पाटील यांच्याकडे ग्रामस्थनी गावाला नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी केली. क्षणाचा विलंब न करता जयंत पाटील यांनी सदर मागणी मंजुर करून ताबडतोब कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता बिराजदार यांनी कामाला सुरुवात केली आहे. यामुळे गावातील पाण्याची समस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.